भागवतांनी कटू सत्यच सांगितले!

Tuesday, February 24, 2015

bhagwat-uddhav


आपल्या देशात जे जे मिशनरी आले, त्या सर्वांच्या सेवाकार्याचा उद्देश इथल्या लोकांना ख्रिश्चन बनवणे हाच राहिला आहे. शेकडो वर्षांपासून देशातच नव्हे, तर जगभरात मिशनऱ्यांचे हेच उद्योग सुरू आहेत. त्यामुळे रा. स्व. संघाच्या सरसंघचालकांनी जे सांगितले ते कटू सत्यच आहे, अशी ठाम भूमिका घेत शिवसेनेनं मोहन भागवतांची पाठराखण केली आहे.

मुसलमानांनी तलवारीच्या जोरावर धर्मांतरे घडवली त्यामुळे ती लक्षात आली. मिशनर्‍यांनी
पैसा व सेवेचा गूळ लावून गरिबांना 'इसाई' बनवले हे सत्य नाकारता येत नाही. सरसंघचालकांनी तेच सत्य परखडपणे मांडून राष्ट्रीय कार्य केले आहे, असं प्रमाणपत्रच शिवसेनेनं 'सामना'च्या अग्रलेखातून दिलंय. अर्थात, थेट मदर तेरेसा यांना लक्ष्य करणं त्यांनी टाळलंय. मदर तेरेसा यांच्या सेवेबद्दल व सामाजिक कार्याबद्दल आदर असल्याचं त्यांनी काहीसा सावध पवित्राही घेतलाय.

'मदर तेरेसा यांनी केलेल्या गरिबांच्या सेवेमागे नागरिकांचे ख्रिश्चन धर्मात धर्मांतर करणे, हा मुख्य हेतू होता,' असा आरोप मोहन भागवत यांनी केला होता. या विधानावरून देशभरात वाद पेटलाय आणि त्याचे पडसाद संसदेतही उमटलेत. भाजपविरोधी राजकीय पक्षांनी भागवतांवर टीकेची झोड उठवली आहे. मात्र, शिवसेना भागवतांच्या पाठीशी उभी राहिली आहे. त्यांनी सरसंघचलाकांच्या विधानाचं खुलेपणानं समर्थन केलंय. शिवसेना-भाजपमध्ये कुरबुरी सुरू असतानाही, हिंदुत्वाचा मुद्दा लक्षात घेऊन सेनेनं भागवतांची पाठराखण केल्यानं युतीतील एकीचेच संकेत मिळत आहेत.

शिवसेना म्हणते,

>> पोटातल्या आगीवर धर्मांतराच्या भाकर्‍या शेकण्याचे काम मिशनरी सातत्याने करीत राहिले आहेत.

>> ईशान्येकडील राज्यातील, झारखंड, छत्तीसगडसारख्या राज्यांतील गरीब आदिवासींचे जे धर्मांतरण झाले ते मिशनर्‍यांनी सेवेच्या नावाखाली त्यांना प्रलोभने दाखवली त्यामुळेच.

>> कुणी स्वखुशीने धर्म बदलत असेल तर त्यास कोण रोखणार? पण तुम्ही सेवेच्या नावावर धर्मांतर करणार असाल तर तो 'सेवा' शब्दाचा अपमान आहे.

>> या देशात जे जे मिशनरी आले त्या सर्वांच्या सेवाकार्याचा उद्देश येथील लोकांना 'इसाई' म्हणजे ख्रिश्‍चन बनवणे हाच राहिला आहे. भागवत यांनी जे सांगितले ते सत्य आहे.

>> मदर तेरेसा यांनी देशातील गोरगरीबांसाठी, त्यांच्या वैद्यकीय उपचारांसाठी जे संस्थात्मक कार्य केले आहे ते नक्कीच गौरवास्पद आहे. अर्थात देशभरात अशी सेवा अनेक समाजपुरुषांनी केली आहे. मात्र त्याबदल्यात धार्मिक आमिषे दाखवली गेली नाहीत किंवा धर्मांतरे घडवून आणली गेली नाहीत.

>> बाबा आमटे यांनी कुष्ठरोग्यांसाठी निबीड जंगलात 'आनंदवन' उभे केले, पण ती सेवा करताना धर्माची लेबले लावली नाहीत.

>> दिल्लीतील चर्चवर हल्ला होतो तेव्हा अमेरिकेच्या अध्यक्षांपासून रोमच्या 'पोप'पर्यंत सगळे लोक हिंदुस्थानला धार्मिक सद्भावनेचे धडे देत असतात, पण त्याच हिंदुस्थानात हिंदू धर्माचा गळा घोटण्याचे काम मुसलमान व ख्रिस्ती धर्माचे लोक करतात तेव्हा मात्र ते प्रत्येकाचे 'धार्मिक स्वातंत्र्य' ठरवले जाते.

>> शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जे सांगत होते त्यावरच सरसंघचालकांनी शिक्कामोर्तब केले. सरसंघचालकांनी जे सांगितले ते 'घर वापसी' आंदोलनास बळ देणारेच आहे. भागवतांचे आम्ही अभिनंदन करतो!

You Might Also Like

0 comments